जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांचे हफ्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत.
राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार उदंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत ह्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांनी अर्ज सादर केले, त्यांना या योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हफ्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात तब्बल 5 हफ्ते म्हणजे 7500 रुपये जमा झाले आहेत. आता, उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र, त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येईल.
