जनशक्ती (वृत्तसेवा)- शेतकऱ्यांची विजेच्या समस्येमुळे होणारी अडचण लक्षात घेता, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
