जनशक्ती (वृत्तसेवा)- आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी चंद्रभागा तिरी भाविकांचा महापूर आला आहे. आज दशमीला १० ते १२ लाख भाविकांची गर्दी याठिकाणी दिसून झाली आहे. पंढरपूरच्या नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्गावर लाखोंच्या संख्येने भाविक उतरले आहेत. शेकडो दिंड्या रस्त्यावर उतरल्याने हरिनामाच्या गजरात पंढरी नगरी दुमदुमून गेली. पंढरपुरात भक्तीचा आणि भक्तांचा महापूर आलेला आहे.
आषाढी एकादशीच्या नेत्रदीपक सोहळ्यासाठी लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तिरी जमला आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांचा महासागर लोटला आहे. नुकत्याच झालेल्या हाथरस दुर्घटनेनंतर प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले असून चंद्रभागेच्या अरुंद घाटावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्यात येत आहे. चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त सुरू आहे. आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. विठ्ठल मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते. यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही सांगितले. भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत आहे. दर्शन रांगेतील भाविकांना १५ लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
