जनशक्ती (वृत्तसेवा)- एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल असं सांगितलं. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलं, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो निर्णय मान्य असेल, असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता देशासह महाराष्ट्राला लागली होती. अखेर निकालाच्या चार दिवसानंतर आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
उद्या मोदी, शाह साहेबांबरोबर मी, अजित पवार, फडणवीस यांची बैठक आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत आम्ही सरकार संदर्भात निर्णय घेऊ,असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे म्हणाले, मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, हा सर्वात मोठा विजय आहे. महायुतीचा विश्वास, विकास कामे जी महाविकास आघाडीने थांबवली ती आम्ही सुरू केली, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा विजय जनतेचा आहे, निवडणुकीच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी देखील सर्व सामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलो आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते, मी समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, लढणारे लोक आहोत. माझ्या रक्ताचा शेवटच थेंब असे पर्यंत मी जनतेसाठी काम करेन. मी जीव तोडून काम केलं, त्यामुळेच हे यश प्राप्त झालं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं ते महत्त्वाचं आहे.
