बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ऊर्जावान समाजनिर्मितीसाठी पुरस्कार गरजेचे असून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धडपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची मन्वंतर संस्थेची परंपरा अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक प्रा. डॉ. साताप्पा चव्हाण यांनी केले. देडगाव (ता. नेवासा) येथील मन्वंतर सामाजिक संस्था संचलित तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलने आयोजित केलेल्या विविध क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चव्हाण बोलत होते.
डॉ. चव्हाण पुढे म्हणले, भविष्यात सक्षम समाज निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी जोमाने कार्य करावे, आणि उत्तम समाज निर्मितीच्या कार्यास हातभार लावून देशहिताचे कार्य करावे. यावेळी मन्वंतर आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार प्रा.डॉ. अशोक कानडे व तुषार अंबाडे, मन्वंतर दिव्यांगस्नेही संस्था राष्ट्रीय पुरस्कार अहिल्यानगर येथील दिव्यदृष्टी दिव्यांग संशोधन व विकास संस्थेस तर मन्वंतर आदर्श पत्रकार राष्ट्रीय पुरस्कार दैनिक सकाळचे कुकाणा येथील बातमीदार रवींद्र उर्फ बाळासाहेब रामचंद्र सरोदे- सूर्यवंशी यांना डॉ.चव्हाण आणि उद्योगपती सुरेश शेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. अभिषेक गडाख (एमबीबीएस), डॉ. आकांक्षा कदम (बी.ए.एम.एस) व सत्यम पवार शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले.
यावेळी सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योगपती श्री. सुरेश शेटे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना मन्वंतर संस्थेचे संस्थापक प्रा. विजय साहेबराव कदम यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन समाजाने चांगल्या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल कदम यांनी केले. राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभास सरपंच चंद्रकांत मुंगसे, शेती अधिकार संजय कदम, साहेबराव कदम, मन्वंतर संस्थेच्या संचालिका शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, प्रभाकर पवार, दीपक गडाख, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक व भाऊसाहेब अंबाडे, गोरक्षनाथ कदम, अविनाश कदम, विमल गडाख यांच्यासह गावकरी,पालक ,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी सर्वांचे आभार मानले. सई कदम व शुभदा पागिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
