जनशक्ती (वृत्तसेवा)- जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून, तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. खेडकर परिवाराचे मोठे योगदान तमाशा कलेसाठी आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्याकडून मिळालेला कलेचा समृद्ध वारसा रघुवीर खेडकर यांनी यशस्वीपणे पुढे नेला. आव्हानात्मक परिस्थितीत तमाशा कलेला जिवंत ठेवण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाचा गौरव केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून तमाशा कलेकडे पाहिले जाते. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी आपल्या त्यागाने महाराष्ट्राच्या कला परंपरेची जोपासना केली आहे. अशा कलेची सेवा करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा बहुमान या पुरस्काराने झाला आहे.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रवरा परिवाराने स्व. कांताबाई सातारकर यांना देऊन सन्मानित केल्याची आवर्जून आठवण श्री.विखे पाटील यांनी सांगितली.


