भाषेचा अभिमान आणि विज्ञानाची जाण यांचा संगम प्रेरणादायी-  पत्रकार एडके

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भाषेचा अभिमान आणि विज्ञानाची जाण यांचा संगम प्रेरणादायी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे ही समाधान व अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. दत्ता कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर कसा असावा, याचे विविध उदाहरणांद्वारे महत्त्व पटवून दिले. रूढवाक्य आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य यांतील फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांना भाषेची अचूकता आणि अभिव्यक्तीची समृद्धी यांविषयी मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. मंदार कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाच्या विविध शोधांमुळे मानवजीवनात झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला. विज्ञानामुळे कठीण कामे कशी सुलभ झाली, कमी वेळेत अधिक कार्यक्षमता कशी साध्य झाली, याची माहिती त्यांनी दिली. विज्ञानाबरोबरच मातृभाषेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपल्या मनोगतात विज्ञानाचा अविष्कार आणि मराठी भाषेतील आपलेपणा, प्रेम, ओलावा व आपुलकी यांचा सुंदर संगम उलगडून दाखविला. मराठी भाषेला प्राप्त झालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त करत, त्या दर्जामागील संतपरंपरा व साहित्यिकांचे योगदान त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. भाषेचा शब्दशः अर्थ घेतल्यास कशी गैरसमजूत होऊ शकते, हे उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी विज्ञानातील विविध अविष्कारांचा उल्लेख करत सी. व्ही. रमण यांनी शोधलेल्या ‘रमन इफेक्ट’चा संदर्भ दिला. विज्ञानामुळे समाजजीवनात झालेले सकारात्मक बदल अधोरेखित करतानाच मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामागील साहित्यिकांचे परिश्रम त्यांनी विशद केले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा उल्लेख करत वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बोरुडे हिने केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अमोल दहातोंडे यांनी करून दिला. अध्यक्षीय सूचना प्रा. अजित हरिश्चंद्रे यांनी मांडली, तर अनुमोदन प्रा. शुभम पाटील यांनी दिले. आभार प्रा. प्राजक्ता गायके यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणादायी विचारांनी आणि शिस्तबद्ध आयोजनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.