नेवासा (प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे कार्य राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन वेदांताचार्य ह.भ. प. देविदास महाराज म्हस्के यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत “संकल्प दिन” साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई येथील कौतुकी नदीच्या सुशोभीकरण व पुनर्जीवन उपक्रमाचा शुभारंभ वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी म्हस्के महाराज बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बाबा अनारसे यांनी केले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत प्रतिष्ठानमार्फत कौतुकी नदी सुशोभीकरण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून हे उपक्रम राबविले जात असून त्यासाठी समाजाचे मोठे पाठबळ लाभत आहे. दत्तकग्राम, “गाव तिथे वाचनालय”, संकल्प साध्या विवाहाचा, मरणोत्तर नेत्रदान, वृक्षारोपण व संगोपन यांसह विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात.
ते पुढे म्हणाले की, यशवंतराव गडाख यांनी तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विविध संस्था उभारण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर समाजहिताचे उपक्रम आपण सातत्याने राबवत आहोत. सोनईसह परिसराची जीवनदायिनी असलेल्या कौतुकी नदीचे २०१२ मध्ये प्रशांत गडाख यांनी यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुशोभीकरण करून नदीचे रुपडे पालटले होते. मात्र वाढते नागरीकरण, नदीत सोडले जाणारे सांडपाणी व कचरा यामुळे नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले होते.
त्यामुळे पहिल्या टप्प्यात नदीचे पुनर्जीवन आणि दुसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देत यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने १० लाख रुपयांच्या देणगीची घोषणा करण्यात आली. तसेच सोनई गावासाठी नियमित कचरा संकलन व्हावे यासाठी नवीन घंटागाडी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही शंकरराव गडाख यांनी सांगितले.
“कौतुकी ही फक्त नदी नसून ती आपली माता आहे,” अशी भावना ठेवून सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सोनई गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी यशवंत प्रतिष्ठानने आजपर्यंत तालुक्यातील ११५ मुलींचे शैक्षणिक दत्तक पालकत्व स्वीकारून त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केल्याची माहिती देण्यात आली. तसेच संकल्प दिनानिमित्त गरजू कुटुंबातील आणखी ५१ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात येणार असल्याची घोषणा शंकरराव गडाख यांनी केली. कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री क्षेत्र ज्ञानेश्वर देवस्थानचे ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी नदीचे पुनर्जीवन आणि निसर्गसंवर्धन हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगितले.
वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपणारे कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, “नेवासा तालुका भाग्यवान आहे. तालुक्याला यशवंतराव गडाख यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले. त्यांचे नेतृत्व राज्याला दिशादर्शक आहे. संत-महंतांचा समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला नेहमीच आशीर्वाद असतो. कौतुकी नदीचे रुपडे पालटल्याने सोनई गावाच्या वैभवात भर पडणार आहे.” मुलींच्या शिक्षणासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगत गडाख परिवार जनतेवर प्रेम करणारा परिवार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने यशवंतराव गडाख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भर उन्हात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते हे प्रेमाचे प्रतीक असल्याचा उल्लेखही करण्यात आला. याप्रसंगी मा. आ. पांडुरंग अभंग, कारभारी जावळे, प्रकाश शेटे, नागेश आघाव, डॉ. रामनाथ बडे, गफूर बागवान आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विश्वासराव गडाख, सुनीलराव गडाख, अशोकराव गायकवाड, तुकाराम शेंडे, जबाजी फाटके, कॉ. बाबा आरगडे, नानासाहेब तुवर, रावसाहेब कांगुणे, नंदकुमार पाटील, यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख, नानाभाऊ नवथर, भगवानराव गंगावणे, दत्तात्रय काळे, अजित मुरकुटे, रंगनाथ रौंदळ, काशिनाथ नवले, तुकाराम मिसाळ, नानासाहेब रेपाळे, दादासाहेब शेळके, काकासाहेब शिंदे, संजय सुखदान, वसंतराव देशमुख
रामभाऊ जगताप, काकासाहेब गायके, रवी जोशी, सुरेश गडाख, कैलास झगरे, विक्रम चौधरी, गोरक्षनाथ तनपुरे, माऊली कार्ले, अशोक मंडलिक, कृष्णा शिंदे, शिरूभाऊ हारदे, अशोक हारदे, राजेंद्र परसैय्या, बंडू हारदे, संभाजी आगळे, बाजीराव मुंगसे, कारभारी चेडे, लक्ष्मण बनसोडे, कडूभाऊ तांबे, माणिकराव होंडे, अनिल घुले, महेश शिंदे, योगेश शिंदे, जीवा साठे, बाबासाहेब रोटे, बाळासाहेब शिंदे, वामनराव तुवर, बाबा घुले, भगवान शेजुळ, बाळासाहेब पाटील, अशोकराव मिसाळ, हरिभाऊ थोरे, शिवाजी पाठक, दौलत देशमुख, दत्तात्रय खाटीक, मदनराव डोळे, बाळासाहेब नवले, बाप्पूसाहेब शेटे, संजय जंगले, सतीश फुलसौंदर, आण्णासाहेब केदार, पांडुरंग निपुंगे,
दादासाहेब दरंदले, ॲड. गोकुळ भताने, ॲड. आण्णा आंबाडे, प्रा. बाळासाहेब घावटे, ज्ञाना बोरुडे, योगेश होंडे, अशोकराव येळवंडे, सुहास गोंटे, संजय लोखंडे,इकबाल शेख,शिवाजी शेरकर,सचिन चोरडिया, कैलास दरंदले, कैलास जाधव, बाबासाहेब कंक यांच्यासह नेवासा नगरपंचायतीचे नगरसेवक, मुळा कारखाना संचालक मंडळ, बाजार समिती संचालक मंडळ तसेच तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ, तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. तसेच कौतुकी सुशोभीकरण उपक्रमासाठी नंदकुमार पाटील, ॲड. आण्णासाहेब आंबाडे व इस्माईल शेख यांनी देणगी जाहीर केली.
नदीचे पुनर्जीवन व ५१ मुलींचे दत्तक पालकत्व
कौतुकी नदी पुनर्जीवन व सुशोभीकरण उपक्रमाची सुरुवात तसेच ५१ मुलींच्या शैक्षणिक दत्तक पालकत्व उपक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

